साक्री तालुक्यात भीषण गारपीट; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
साक्री तालुक्यात भीषण गारपीट; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
धुळे दि. १९ मार्च:
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आज दुपारच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसासह प्रचंड गारपिटीने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा मोठे संकट ओढवले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे कापूस, गहू, मका आणि भाजीपाला यांसारखी उभी पिके काही क्षणांत जमीनदोस्त झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मोठ्या आकाराच्या गारांचा मारा सुरू झाला. या गारपिटीचा सर्वाधिक फटका साक्री तालुक्यातील मालपुर कासारे, पिंपळनेर, गावठी पिरेंजपूर,
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहून हतबलता व्यक्त केली. “घाम गाळून पिक वाढवलं, पण एका क्षणात सगळं संपलं,” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
या गारपिटीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पिकांचे संपूर्ण नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, स्थानिक प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा सुरू केला असून संबंधित अधिकाऱ्यांनी बाधित गावांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
साक्री तालुक्यातील या घटनेने पुन्हा एकदा बळीराजाचे आयुष्य निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असल्याचे अधोरेखित केले आहे. सरकारने त्वरित हस्तक्षेप करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Subscribe to my channel